पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग २ हा सध्या विकासाच्या प्रतीक्षेत असलेला महत्त्वाचा प्रभाग आहे. २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून चिखली गावठाण, जाधववाडी आणि बोऱ्हाडेवाडी या भागांचा चेहरामोहरा बदलतोय, पण मूलभूत प्रश्न सोडवण्यात अद्याप यश आलेले नाही.
१. पोल्टीकल वझीरच्या मते : मतदारांचे गणित
मतदार संख्या: या प्रभागात एकूण ६९,५१८ मतदार असून, पुरुष मतदार (३७,५८७) हे स्त्री मतदारांपेक्षा (३१,९२२) थोडे अधिक आहेत.
मिश्र वस्ती: मध्यमवर्गीय नोकरदार आणि कामगार वर्ग अशा दोन्ही थरातील मतदारांचे येथे प्राबल्य आहे.
आरक्षण: हा प्रभाग ‘अ-ओबीसी महिला’, ‘ब-सर्वसाधारण महिला’ आणि ‘क व ड-सर्वसाधारण’ अशा पद्धतीने आरक्षित आहे.
२. या प्रभागामधील प्रमुख भाग:-
या प्रभागात खालील महत्त्वाच्या वस्त्यांचा समावेश होतो:
चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडेन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर आणि कुदळवाडी भाग.
३. ग्राऊंड रिपोर्ट: प्रश्नांचे ‘चक्रव्यूह’
प्रभागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींसमोर अनेक गंभीर मागण्या मांडल्या आहेत:
पाणी समस्या: वडाचा मळा आणि जाधववाडी परिसरात दूषित पाणी येते, ज्यामुळे नागरिकांना दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे.
वाहतुकीची कोंडी: विठ्ठल मंदिर चौक, शिवरस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण आहेत.
अतिक्रमणाचा विळखा: खेळासाठी आरक्षित असलेल्या रामायण मैदानावर वाहनचालकांनी अनधिकृतपणे ताबा मिळवला आहे, ज्यामुळे मुलांना खेळायला जागा उरलेली नाही.
आरोग्य आणि स्वच्छता: ड्रेनेजमधून मैलमिश्रित पाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढले आहे.
४. विश्लेषण: प्रभाग २ पिंपरी-चिंचवड:-
बळ:- जिल्हा सत्र न्यायालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पोलीस आयुक्तालय यांसारख्या महत्त्वाच्या संस्था याच भागात आहेत.
उणिवा:- अनियमित कचरा संकलन आणि अंतर्गत रस्त्यांवर उडणारी धूळ.
संधी:- रखडलेले रस्ते रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपुलाचा प्रश्न जो सोडवेल, त्याला मतदारांची पसंती मिळेल.
धोके:- अपुऱ्या क्रीडा सुविधा आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये असलेला सत्ताधाऱ्यांविरुद्धचा तीव्र रोष.
५. पोल्टीकल वझीरच्या सूचना :-
प्रभाग २ मध्ये यावेळी विकास की केवळ घोषणा’ हा मुख्य मुद्दा असेल. जो उमेदवार ‘शुद्ध पिण्याचे पाणी’ आणि ‘वाहतूक कोंडीतून मुक्ती’ याचे लिखित आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता दाखवेल, तोच या निवडणुकीत बाजी मारेल.



