पुनापुरात भाजपने कसली कंबर, काँग्रेस ‘चमत्कार’च्या प्रतीक्षेत; प्रभाग २५ मधील स्मार्ट सिटीचे स्वप्न अधुरेच?

नागपूरच्या पूर्व भागातील प्रभाग २५ (पुनापूर परिसर) मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. २०१७ मध्ये भाजपने येथे तीन जागा जिंकून वर्चस्व राखले होते, तर एका जागेवर काँग्रेसने बाजी मारली होती. मात्र, यावेळी बदललेली प्रभाग रचना आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातील रखडलेली कामे यामुळे येथील निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार आहे.

१. राजकीय पेच: भाजपचा गड विरुद्ध काँग्रेसचे आव्हान

भाजपची रणनीती: गेल्या निवडणुकीत भाजपने या प्रभागातील ४ पैकी ३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी सत्ता टिकवण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

काँग्रेसची आशा: २०१७ मध्ये पुरुषोत्तम हजारे यांनी काँग्रेसला या प्रभागात यश मिळवून दिले होते. यावेळी ‘चमत्कार’ घडवण्यासाठी काँग्रेस पुन्हा सज्ज आहे.

बंडखोरीचे सावट: भाजपकडून उमेदवारीसाठी मोठी रांग असल्याने बंडखोरी रोखणे हे नेत्यांसमोर मोठे आव्हान असेल.

२. प्रभाग २५ मधील प्रमुख वस्त्या

या प्रभागात प्रामुख्याने कामगार आणि मध्यमवर्गीय वस्त्यांचा समावेश आहे.

पुनापूर, भवानी नगर, पारडी, नवीन नगर, भांडेवाडी गोंड मोहल्ला,मातंगपुरा, महाजनपुरा, धोपेटपुरा, बैलसाथ बौद्धपुरा, कोष्टीपुरा,डबलेवाडी, उडीया मोहल्ला, घटाटे कोठा, खाटीकपुरा, धनलक्ष्मी सोसायटी,तालपुरा, विनोबा भावे नगर, गंगाबाग, उपरे मोहल्ला, भुजाडे ले-आऊट,गिरिजा नगर, सराई मोहल्ला, जय अंबे नगर, ठवकरवाडी आणि हनुमान नगर

३. ग्राऊंड रियालिटी: ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली समस्यांचा बाजार

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून या भागाचा कायापालट होईल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे.

रखडलेला स्मार्ट सिटी प्रकल्प: पुनर्वसन आणि मोबदल्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, ज्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप आहे.

पाणी टंचाई: उन्हाळ्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण होते, तर पाणी पुरवठा अनियमित आहे.

नाग नदीचा धोका: नाग नदीला लागून असलेल्या वस्त्यांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याची भीती कायम आहे, कारण संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण आहे.

सिवेरेज आणि कचरा: सिवेरेज लाईनची समस्या गंभीर असून कचरा संकलन नियमित होत नाही, ज्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचतात.

वाहतूक कोंडी: रस्त्यावरच बाजार भरत असल्याने आणि अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

४. २०१७ चे विजयी उमेदवार

जयश्री रारोकर (भाजप), पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस), वैशाली रोहनकर (भाजप),दीपक वाडीभस्मे (भाजप)

५.यावेळी इच्छुक उमेदवार

(भाजप): माजी नगरसेवक दीपक वाडीभस्मे, वैशाली रोहनकर, जयश्री रारोकर, महेश्वरी बिसेन, राजेश्वर दिवटे.

काँग्रेसकडून इच्छुक: माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, यशवंत ऊर्फ गुड्डू रहांगडाले, श्रीकांत कैकाडे, शीतल रारोकर, संध्या अतकरी, विनोद चकोले

इतर: नुकतेच यशवंत रहांगडाले यांनी उद्धव सेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे.

‘पॉलिटिकल वझीर’चे मत:

प्रभाग २५ मध्ये जो उमेदवार स्मार्ट सिटीच्या बाधितांना न्याय मिळवून देईल आणि नाग नदीच्या पुरापासून संरक्षण देण्याचे आश्वासन देईल, त्यालाच जनता साथ देईल. केवळ आश्वासनांच्या ‘स्मार्ट सिटी’वर आता मतदार विश्वास ठेवणार नाहीत.