प्रभाग ३१: बालेकिल्ल्यात ‘बंडखोरी’ की ‘बदल’? सतीश होले आणि रवींद्र भोयर यांची प्रतिष्ठा पणाला!

नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३१ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत स्फोटक प्रभाग ठरला आहे. या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील नगरसेवकांनी वेळोवेळी केलेले पक्षांतर आणि बदललेली राजकीय निष्ठा. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेला हा भाग आता काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू बनला आहे.

१. ‘पोल्टीकल वझीर’चा चष्मा: पक्षांतराचा प्रभाव

दोन दिग्गज चेहरे: भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले सतीश होले आणि रवींद्र भोयर या दोन मातब्बर नेत्यांच्या प्रभावामुळे हा प्रभाग काँग्रेससाठी आशेचा किरण ठरला आहे.

भाजपची रणनीती: आपले माजी शिलेदार समोर उभे ठाकल्याने भाजप आता येथे नव्या आणि निष्ठावान चेहऱ्यांच्या शोधात आहे.

२०१७ चे चित्र:

२०१७ मध्ये या प्रभागातून सतीश होले, रवींद्र भोयर, उषा पॅलट आणि शीतल कामडे (सर्व भाजप) निवडून आले होते.

२. निवडणुकीच्या आखाड्यातील ‘इच्छुक यादी:-

या प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी असून, खालील नावे चर्चेत आहेत:

काँग्रेस: माजी उपमहापौर सतीश होले, माजी नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, प्रशांत धवड, सुजाता कोंबाडे, योगेश तिवारी, वंदना मेश्राम, नीता ठाकरे यांच्यासह इतरांची नावे चर्चेत आहेत
भाजप: माजी नगरसेविका शीतल कामडी, उषा पॅलट, राम कोरके, प्रकाश ठाकरे, राजू बोराटे, वशिष्ठ ओझा, रमेश कोलारकर, देवेंद्र दस्तुरे, कृष्णा येरावार, मंगला मस्के यांच्यासह इच्छुकांची यादी मोठी आहे. 

इतर: वंचित बहुजन आघाडी आणि बसपा देखील या प्रभागात दलित आणि मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.

३. ग्राऊंड रिअॅलिटी

प्रलंबित प्रश्न आणि लोकांच्या तक्रारी प्रशासकीय राजवटीत या प्रभागातील काही मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत:

जलतरण तलावाचा प्रश्न: कामगार कल्याण मंडळाचा जलतरण तलाव गेल्या ८ वर्षांपासून बंद आहे. हा येथील तरुणांसाठी आणि खेळाडूंसाठी मोठा चिंतेचा विषय आहे.

ड्रेनेज समस्या: जुन्या रेशीमबाग आणि हनुमान नगर परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार चोक होण्याच्या तक्रारी आहेत.
अस्वच्छता: अंतर्गत रस्त्यांवरील कचरा संकलन अनियमित असल्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते.

४. विश्लेषण: प्रभाग ३१

बळ :- सतीश होले आणि रवींद्र भोयर यांचा दांडगा वैयक्तिक जनसंपर्क

कमकुवत दुवे :- भाजप नेत्यांच्या पक्षांतरामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेला गोंधळ.

धोके :- महायुती किंवा महाविकास आघाडीत जागा वाटपावरून होणारी संभाव्य बंडखोरी.

५. पोल्टीकल वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’

प्रभाग ३१ मध्ये विजय मिळवण्यासाठी ‘कामगार कल्याण मंडळाचा तलाव’ पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन आणि ‘वस्ती पातळीवरील नागरी सुविधा’ सुधारण्याचे वचन महत्त्वाचे ठरेल. येथील मतदार हा वैचारिक पेक्षाही ‘कामाला’ महत्त्व देणारा आहे, त्यामुळे जो उमेदवार जमिनीवर सक्रिय असेल, तोच वझीर ठरेल.