प्रभाग १४ मध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई आणि पावसाळ्यात पूरस्थिती; आकुर्डीकरांचा वनवास संपणार कधी?

पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग १४ हा आकुर्डी, दत्तवाडी आणि विठ्ठलवाडी यांसारख्या महत्त्वाच्या भागांना सामावून घेणारा प्रभाग आहे. एकेकाळी शांत आणि निवांत असलेला हा परिसर आता नागरी समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. ‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड रिपोर्टमधून येथील वास्तव समोर आले आहे.

१. पाणी – सर्वात मोठी डोकेदुखी :-

प्रभागातील नागरिकांचे जीवन दोन ऋतूंमध्ये दोन वेगवेगळ्या समस्यांनी बेजार झाले आहे:

उन्हाळ्यात घसा कोरडा: दत्तवाडी आणि विठ्ठलवाडी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत जटिल आहे. पाणीपुरवठा अनियमित असून तो अत्यंत कमी दाबाने होतो.

पावसाळ्यात घरांत पाणी: पावसाळ्यात येणाऱ्या ओढ्यातील अतिरिक्त पाण्यामुळे विठ्ठलवाडी आणि दत्तवाडी परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते, ज्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होते.

२. रखडलेले प्रकल्प आणि उणिवा:-

प्रशासकीय राजवटीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प रेंगाळले आहेत:

पालखी तळ सुशोभीकरण: विठ्ठलवाडी येथील पालखी तळाचे सुशोभीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, तिथे आजही गढूळ पाण्याची समस्या आहे.

जीर्ण जलवाहिन्या: परिसरातील जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत, त्या बदलण्याचे काम प्रलंबित आहे.

जिजामाता सभागृह: मोहन नगर येथील जिजामाता सभागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्याच्या नूतनीकरणाची गरज आहे.

३. प्रभाग १४ विश्लेषण:-

बलस्थाने:- ऐतिहासिक महत्त्व: जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम याच प्रभागात (आकुर्डी) असतो.

पायाभूत सुविधा: चिंचवड रेल्वे स्थानक आणि एमआयडीसी क्षेत्राशी जवळीक असलेला हा भाग मोक्याचा आहे.

उणिवा:- स्वच्छतेचा अभाव: सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आणि कचऱ्याचे साम्राज्य ही मोठी समस्या आहे.

अनियमित वीजपुरवठा: पाणीपुरवठा सुरू झाला की वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत.

संधी:- नव्या चेहऱ्यांना संधी: प्रस्थापित नेत्यांविरुद्ध असलेल्या नाराजीमुळे नागरी प्रश्नांवर काम करणाऱ्या नवीन उमेदवारांना संधी मिळू शकते.

सांस्कृतिक विकास: जिजामाता सभागृह आणि क्रीडांगणांचा विकास केल्यास तरुणांना मोठे व्यासपीठ मिळेल.

धोके:- वाहतूक कोंडी: अरुंद रस्ते आणि वाढत्या अतिक्रमणामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची मोठी समस्या आहे.

आरोग्याचा धोका: ओढ्याचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढला आहे.

४. प्रभागातील समीकरणे आणि लोकसंख्या

या प्रभागामध्ये चिंचवड रेल्वे स्थानक परिसर, महावीर पार्क, मोहन नगर, रामनगर, काळभोर नगर, शुभ श्री सोसायटी,जय गणेश विजन, विवेक नगर,बजाज ऑटो ,तुळजाई वस्ती विठ्ठलवाडी आणि दत्तवाडी यांसारख्या प्रमुख वस्त्यांचा समावेश होतो.

एकूण मतदारसंख्या: ५७,९७८.

पुरुष मतदार: ३०,९०९ | स्त्री मतदार: २७,०६७.

आरक्षण: अ- मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण खुला.

५. जनतेचा आवाज :-

  • वैशाली कदम (गृहिणी): वीज आणि पाणी या मूलभूत गरजांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
  • यश शेजवळ: तरुणांसाठी व्यायामशाळा आणि खुल्या जागेत स्वच्छता असणे आवश्यक आहे.
  • शुभम कोकरे: जिजामाता सभागृहाचे काम अल्प दरात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावे.

निष्कर्ष:

प्रभाग १४ मधील मतदार यावेळी केवळ आश्वासनांवर भुलणार नाहीत. जो उमेदवार ‘पाणी आणि पावसाळी पाण्याचा निचरा’ या दोन प्रमुख समस्यांवर ठोस तोडगा काढेल, तोच यावेळेस विजयाचा वझीर ठरेल