पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाई होळकर

स्त्रि अबला नसून जगाने दखल घ्यावी असा राज्यकारभार चालवून स्त्रि सक्षमीकरणासाठी एक उत्तम उदाहरण आणि सर्व वाईट रुढी परंपरांना जातिप्रथांना विरोध करणाऱ्या, सर्वधर्मसमभाव माननाऱ्या, मानवतावादी, समाजहितैषी,  व्यापक दूरदृष्टिकोन असणाऱ्या तत्त्वज्ञानी बहुजनहितकारिणी प्रजाहितदक्ष आदर्श महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – मनोज गावनेर

 

अहिल्यामाई स्त्रि सक्षमीकरणाच्या सर्वात मोठ्या प्रतिक आहेत कारण त्यांनी सत्ता हाती घेऊन सर्वसमावेशक पणे राज्यकारभार चालवला. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज घडविले आणि या राजांनी आपल्या स्वराज्यात स्त्रि सक्षमीकरणाचा पाया घातला.

 

पुढे मल्हारराव होळकर या मराठा सुभेदारांनी अहिल्यामाईंना आपली सुन म्हणून पराक्रमी खंडेरावांशी विवाह लावून दिला. मल्हाररावांनी आपल्या निरिक्षक नजरेने अहिल्याबाई होळकर यांच्या मधील गुण पारखले होते.

 

खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी अहिल्यामाईंना सति न जाऊ देता प्रशासनात सामिल केले आणि मल्हाररावांच्या मृत्यूनंतर स्वतः अहिल्यामाईंनी संपूर्ण राज्यकारभार आपल्या हाती घेऊन शिवबांनी स्थापिलेल्या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात मोलाचा हातभार लावला.

 

त्या स्वतः विधवा असुन त्याकाळी राज्यकारभार चालविला आणि वाईट रुढी परंपरांना न जुमानता स्त्रियांसाठी न्याय्य भुमिका घेतली. पण आजही कुठे कुठे पुरूषी मानसिकतेमुळे स्त्रियांना गुलामासारखी वागणूक दिली जाते आणि स्त्रियांनी फक्त घरापुरते मर्यादित समजल्या जाते किंवा फक्त त्यांनी सांगितले तेवढे करावे, प्रश्न विचारू नये असे संकुचित जगणे करतात.

 

पण स्त्रियांमध्ये नवनिर्मिती करणे, मुलांवर संस्कार करणे इत्यादी क्षमता असते आणि मनात आणले तर एकटीच खंबीरपणे घरदारही चालवू शकते तेवढेच नाहि, तर उत्तम शासनकर्ती सुद्धा होऊ शकते.

 

सत्तापिपासु औरंगजेब

 

अहिल्यामाईंनी अनेक तलाव, विहिरी, पाणपोई, घाट, पांथशाळा, आश्रयशाळा, अन्नछत्रे बांधली, तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा बांधून अनेक समाजोपयोगी कामे केली आणि वास्तुशिल्प व कलाकुसरीचा उत्तम नमुना म्हणून मंदिर, दर्गा ई. बांधून ते सर्व जातिंसाठी खुले केले आणि त्यामाध्यमातून कारागिरांच्या, कलाकारांच्या कार्याला वाव मिळवून दिला त्याचबरोबर गोरगरिब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले.

 

त्यांनी काव्य, संगित, कला, उद्योग ई. कारागिरांना, कलाकारांना, मूर्तिकारांना आश्रय देऊन त्यांना सन्मान व वेतन देऊन ते जपण्याचे, वाढवण्याचे काम केले.

 

अहिल्यामाईंनी राजकारणातील बारकावे व तत्त्व व्यावहारिक निती नियम व सूत्रे आपल्या राज्याची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे आधीच समजून घेतले होते.

 

त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व प्रजेची चोर, दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत, अशा लुटारू लोकांना गायी, म्हशी आणि जमीनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला.

 

भिल्लांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. अहिल्यामाई सामाजिक वास्तव नाकारत नसे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जात असे.

 

त्यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्वपरिचित होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता आणि न्यायदानात विलंब करणे म्हणजे न्याय नाकारणे हे तत्त्व त्यांना माहित होते.

 

अहिल्यामाईंनी स्वतःच्या कवायतीत ५ हजार स्त्रियांची तुकडी उभी केली होती. ज्यावेळी राघोबा पेशवाने आक्रमण केले होते त्यावेळी ही तुकडी लढण्यासाठी सज्ज केली होती.

 

तेव्हा राघोबा पेशवाला काय करावे कळेना कारण हरलो तर स्त्रियांकडून हरू आणि जिंकलो तरि स्त्रियांकडून जिंकण्यात कसला पराक्रम असे पेशवाला वाटले म्हणून त्याने माघार घेत तह केला. येथे अहिल्यामाईंच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे दर्शन जाणवते.

 

आणि बाबरी पाडल्या गेली…

 

पण सद्या देशातील प्रस्थापित जातिय तेढ निर्माण करण्यासाठी हिंदू – मुस्लिम, मराठा – धनगर, आदिवासी – धनगर, मराठा – OBC अशा प्रकारची भांडणे लावण्यासाठी कारस्थाने रचत असतात आणि यासाठी आपल्यातीलच बहुजनांमधील काहींचा हस्तक म्हणून वापर करत असतात आपण त्यांना वेळीच ओळखून सर्वसमावेशक वैचारिक भुमिका घेतली पाहिजे.

 

कारण आपल्या देशात देशाचे संविधान जाळल्या जाते तरि जाळणाऱ्यांना काहीच होत नाही पण एखादा धर्मग्रंथ जाळला असता तर रक्तपात केल्या गेला असता. संविधानावर विश्वास ठेवणारे हिंसेचे समर्थन कधीच करत नाही म्हणून लोकशाहीमध्ये हिंसा हि कुठल्याही गोष्टिसाठी होत असेल तरि ती घातकच असते.

 

म्हणून अशावेळी आपण आपल्या महामानवांच्या विचारांचा जागर करणे गरजेचे आहे. त्यांना समजून घेऊन त्यांनी सांगितलेला मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारणे अतिशय गरजेचे, महत्त्वाचे असते. अहिल्यामाईंनी केवळ एका जातिपुरते राज्यकारभार चालविला नाही किंवा एका जातिपुरते कार्य केले नाही.

 

अहिल्यामाईंनी आपल्या मुलीचा विवाह गुणी, शुर, पराक्रमी यशवंतराव फणसे या तरुणाशी लावून दिला होता. त्यांच्या राज्यात जातिप्रथेला थारा नव्हती कारण त्या शिवबांच्या स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या हेतुने राज्यकारभार सांभाळत होत्या. म्हणून त्यांना केवळ एका जातिच्या चौकटित बंदिस्त करणे हा त्यांचा सर्वात मोठा अपमानच ठरेल. 

 

सावित्रीबाई फुले यांनी अहिल्याबाई होळकर यांचे नाव देऊन वृद्धाश्रमाला अहिल्याश्रम नाव दिले, शाहु महाराजांनी पहिला दवाखाना अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ काढला. आपल्या बहुजनांच्या महामानवांचा इतिहास पाठ्यपुस्तकात सामिल करणे गरजेचे आहे.

 

सद्या कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रतिनिधित्व मिळणे महत्त्वाचे असते म्हणून प्रशासनात सामिल होणे तर महत्त्वाचे असतेच पण आरक्षणाला फोल ठरवून विनापरिक्षा काही भांडवलदारी पिलावळांना क्लास वन सारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केल्या जाते, आपल्या हक्काच्या जागा इतरांना दिल्या जाते हे एकप्रकारे आपले शोषणच असते म्हणून या गोष्टिला प्रखर विरोध करावा लागतो.

 

परिवर्तनासाठी प्रशासनासोबतच स्वार्थरहित पणे राजकारणात सक्रिय होऊन बहुजनांनी प्रतिनिधित्व करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. स्वार्थ त्यागासाठी आपल्या महामानवांचे उच्च उदात्त खरे विचार समजून घेऊन आत्मसात करणेही सर्वात महत्त्वाचे आहेच.

 

अहिल्यामाईंनी आपल्या शासनव्यवस्थेत टपाल सेवा, पाणी व्यवस्थापणाची आताही अनुकरणीय असे जलव्यवस्थापन, गावातील तंटा गावातच मिटावे यासाठी तशी व्यवस्था गावागावात करणे, आता कौशल्य भारताची हवेत होणारे काम आहे पण अहिल्यामाईंनी त्यावेळी कौशल्य निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली होती.

 

आताच्या अनेक शासकिय प्रकल्पामध्ये अनेक भांडवलदारांचे हितसंबंध गुंतलेले आहे पण त्यावेळी अहिल्यामाईंनी फक्त गोरगरिबांना रोजगारासाठी, कारागिर, कलाकार यांच्या उत्कर्षासाठी आणि सामान्यजनांच्या उपयोगासाठी कामे केली.

 

अहिल्यामाईंच्या जीवनात अनेक दुःखद प्रसंग आले. त्यांचा पति, सासरा, मुलगा, जावाई, मुलगी, नातू असे एक एक मृत्यूमुखी पडत गेले पण तरिही त्यांनी संयम ढळू न देता धैर्य बाळगून आलेल्या संकटाला खंबीरपणे तोंड दिले आणि आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत गेल्या.

 

अहिल्यामाईंच्या कार्यकर्तृत्वापासून व विचारांपासून संयम सुद्धा बाळगुया आणि स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत कोरोनारूपी आलेल्या संकटाला खंबिरपणे तोंड देऊया. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. शत् शत् नमन् .. जय मल्हार..

 

✍🏻 – मनोज गावनेर

   मंगरूळ चवाळा (अमरावती)

   9730408891

 

(सदर लेखातील तथ्यांव्यतिरिक्त मांडलेले विचार माझ्या अल्प अनुभवातून मांडले आहे तरि त्यात काही चुकीचे असल्यास किंवा काही त्रुटी जाणवल्यास लक्षात आणुन द्यावी ही नम्र विनंती)

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir